उलवे, दि. २५ : उरण येथील श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीची दत्त मंदिरात मंगळवारी विधिपूर्वक पूजा करण्यात आली. ही पूजा आणि आरती करण्याचा मान आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना मिळाला. त्यानंतर मंडळातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, मी गेली ३८ वर्षे शिर्डीला न चुकता जातो आहे. १९८७ मध्ये न्हावायार्डला काम करताना प्रथम एसटीने शिर्डीला गेलो. तेव्हापासून साईबाबांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळे प्रत्येक दिंडीला मी मदत करीत आलो आहे. श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गानेच माझी वाटचाल सुरू आहे. शेलघर येथे उभारण्यात येत असलेले भव्य साई मंदिर लवकरच पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता हजारो साईभक्त पालखीसह शिर्डीकडे प्रस्थान करताना महेंद्रशेठ घरत यांनी साईंच्या पालखीला मानाचा खांदा दिला. यावेळी उरण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर उपस्थित होत्या.श्री साई सेवा मंडळ उरण काढत असलेल्या या पालखीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या मंडळाच्या आदर्शाने उरण परिसरात शिर्डीला पायी दिंडी काढण्याची परंपरा बळ मिळाल्याचे घरत यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पायी दिंडीने शिर्डीला जाणाऱ्या तरुणांना महेंद्रशेठ घरत यांच्या वतीने टी-शर्टचे वितरण करण्यात आले. मागील चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. यावेळी एम. जी. ग्रुपचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे, सेक्रेटरी जगदीश कडू, खजिनदार अमित कडू, तसेच मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.साईनामाच्या गजरात निघालेली ही पालखी ३ डिसेंबर रोजी शिर्डीला पोहोचणार आहे.
0 Comments